माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागीतली आहे. ब्राह्मण बांधवांच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असं खडसेंनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. मी कायमच ब्राह्मणांचा आदर केला आहे, असंही खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी ट्विटवरुन ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागितली आहे. “दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं खडसेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते खडसे?

मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना खडसेंनी फडणवीस आणि त्यांच्यादरम्यानच्या वादाबद्दल भाष्य केलं. दोघांमधील वादाचं कथन करताना ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं,” असं विधान खडसे यांनी केलं होतं. “नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा- मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं – एकनाथ खडसे

आपण भाजपा का सोडली याच कारण सांगताना खडसे यांनी, “भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. या अशा लोकांमुळे मला भाजपा सोडवी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” असं म्हटलं होतं. “मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पक्षाला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भाजपाशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसानं छळलं” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली.