आई म्हणजे ईश्वराचीच एक अनुभूती आहे, आईपासूनच माणसाला शहाणपण मिळते, तिच्या माध्यमातून झालेले संस्कार व तिने उजळलेले आयुष्य जागाला दीपवून टाकणारे असते, म्हणूनच रक्ताचे व रक्तातून वाहणारे गणगोत सांभाळण्याची सध्या गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी माहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कवी फ. मुं. शिंदे यांनी केले.जिजाबाई बाबुराव साळुंके यांच्या स्मरणार्थ दिला जाणाऱ्या ‘आदर्शमाता’ पुरस्कारांचे वितरण शिंदे यांच्या हस्ते रविवारी नगरमध्ये करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सत्यभामा बद्रीनाथ तनपुरे (पंढरपुर), मुक्ता हणमंतराव डांगे (वडाळी, श्रीगोंदे), हौसा दगडू बांडे (टाकळीढोकेश्वर, पारनेर) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.जगात माती आणि माता सर्वश्रेष्ठ आहेत, रक्ताची नाती प्रत्येकालाच असतात तरीही ती कधी तुटतील हे सांगता येत नाही, परंतु रक्तातून वाहणारी नाती कधी तुटत नाहीत, नाती जपण्यासाठी शब्दांचाही योग्य वापर झाला पाहिजे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी ‘आई’ कविता सादर केली. यावेळी बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचेही भाषण झाले.अनिल साळुंके यांनी पुरस्कारामागील हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन अरुण साळुंके यांनी केले. उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, शिवाजीराव पाटील, नगरसेवक गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.