करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. अशा स्थितीत महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात करोना रुग्ण वाढत चालले आहेत. याची जाणीव राज्य शासनाला झाली आहे. त्यासाठी शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनाच्या दुसऱ्याला दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार तत्पर झाले आहे, असेही सामंत यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा अधिवेशनाच्या तोंडावर महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढतात कसे? असा बोचरा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर सामंत यांनी ‘महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात देखील करोनाचे रुग्ण वाढत आहेत. याचा अर्थ त्या राज्यातही अधिवेशन असल्यामुळे असे रुग्ण वाढत आहेत का? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांमध्य राज्यात करोनाचे रुग्ण वाढू लागलेल आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरू ठेवावीत का? ठेवली तर ती किती क्षमतेने सुरू ठेवावीत? किंवा ती बंद करावीत का? यासंदर्भात स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.