अलीकडे वाचन चळवळ कमी होत आहे, तरूण पिढी पुस्तकापेक्षा हातातील स्मार्ट फोनवर आलेले मेसेज वाचण्यात मग्न असते. पुस्तकांचा खजिना अडगळीत गेला असल्याची चर्चा सार्वत्रिक होते. मात्र, योग्य वयात जर मुलांच्या हाती पुस्तके दिली तर त्यांना वाचनाची गोडी लागू शकते. हाच धागा पकडून आपल्या आई-वडिलांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी तासगावच्या म्हेत्रे कुटुंबाने २६ शाळेतील मुलांना पुस्तकांचे वाटप करीत आगळी वेगळी आदरांजली वाहिली. तासगावची ओळख दुष्काळी तालुका म्हणून असताना आपल्या जिद्दीच्या जोरावर संशोधन करीत या दुष्काळी भागातील मातीतही गोड द्राक्षे उत्पादन करण्याची किमया कष्टाळू शेतकऱ्यांनी साधली. अशा या तासगावची ओळख आज द्राक्षासाठी जगभर झाली आहे. याच मातीत चार बुके वाचून केवळ अक्षर साक्षर होण्यापेक्षा प्रज्ञावंत पिढी तयार व्हावी या भावनेतून म्हेत्रे कुटुंबाने आपल्या माता-पित्यांच्या पुण्यस्मरणार्थ लाखो रूपयांच्या पुस्तकांचे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम समाजासमोर ठेवला. द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे, अनिल म्हेत्रे आणि कुटुंबीय सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांच्या आई रुक्मिणी म्हेत्रे, चुलत बंधू संशोधक आणि प्रयोगशील शेतकरी आर. डी. म्हेत्रे यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यांचा पहिला स्मृतिदिन आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाने करण्याचे कुटुंबाने ठरविले. तासगाव शहरातील २६ शाळांतील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शालेय पुस्तकांव्यतिरिक्त बाल वाङ्मय, विज्ञान, आरोग्य, योग संस्कार या विषयांवरील पुस्तके भेट देण्यात आली. शहरात प्राथमिक, माध्यमिक शाळांत ६ हजार ५०० विद्यार्थी शिकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला एक याप्रमाणे पुस्तके शिक्षकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ज्या ग्रंथालयात आर. डी. भाऊ संचालक होते, त्या आमदार आर. आर. पाटील ग्रंथालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला राज्यसेवा आणि अन्य स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नव्या अभ्यासक्रमांची ३५० पुस्तके देणगी देण्यात आली. पुस्तकांची निवडही चोखंदळपणे करण्यात आली आहे. कथा कादंबऱ्यांपेक्षा चित्रमय, गोष्टीरूप, संस्कारक्षम अशी पुस्तके जी मुले आवर्जून वाचतील, अशा पद्धतीने निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार संदर्भग्रंथांचाही समावेश करण्यात आला. शिक्षण आणि वाचन मुलांना सुशिक्षित बनविते म्हणून पुस्तके देण्याचा उपक्रम राबवला, प्रत्येकजण समाजाचे देणे लागतो त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न केल्याची भावना म्हेत्रे कुटुंबीयांनी व्यक्त केली. वाडवडिलांच्या स्मृती जपण्यासाठी पुस्तकवाटपासारखा उपक्रम राबवून म्हेत्रे कुटुंबीयांनी वेगळे उदाहरण समाजासमोर ठेवले असल्याचे मत शिक्षिका विनया कुलकर्णी यांनी व्यक्त केले.