महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये राज यांनी १४ जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच तुमच्या भागातील नागरिकांना मदत करा त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील असंही राज यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

राज यांचे पत्र जसेच्या तसे…

आज खूप दिवसांनी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांशी मी पुन्हा थेट संवाद साधतोय याचा मला मनापासून आनंद होत आहे. मार्च महिन्यात करोनाचं संकट राज्यावर आणि देशावर येऊन कोसळलं आणि उत्तरोत्तर ते अधिक गडद होत गेलं. आजही त्याची तीव्रता कमी झाली आहे असं नाही. पण मागे मी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे जोपर्यंत या आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला करोना साथीसोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल आणि सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते.

गेल्या दोन तीन महिन्यांच्या कळात येणाऱ्या बातम्यान मन विषण्ण करणाऱ्या होत्या. फक्त त्यात एकच दिलासा देणारी बाब माझ्यासाठी असायची ती म्हणजे या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणावर पदरमोड करुन, लोकांच्या मदतीला धावून जातोय ही. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देण्याचा , रुग्णांच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत रहायचा.

महाराष्ट्र सैनिकांनी या काळात केलेल्या कामाचं कौतुक मला अनेक लोकांनी व्यक्तिश कळवलं. मी मनापासून सांगतो की मी खरचं भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. बरं, हे करत असताना रोज माझा महाराष्ट्र सेनिक स्वत:चा आणि त्याच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत होता. कित्येक महाराष्ट्र सैनिकांना करोनाची लागण देखील झाली तरीही ना माझा महाराष्ट्र सैनिक मागे हटला ना त्याचे कुटुंबीय. ही ताकद येते ती महाराष्ट्रावरच्या निस्सीम आणि निर्व्याज प्रेमातून. तुमच्या या ताकदीला आणि तुमच्या कुटुंबियांच्या शौर्याला आणि त्यागाला माझा सलाम.

आणि हो १४ तारखेला माझ्या विढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगली आहे. करोनामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. करोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पादाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी माझा सूचनावजा आदेश आहे की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या. याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जीवाची काळजी घ्या. तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच.

दरवर्षी राज यांच्या वाढदिवसानिमित्त दादरमधील त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी कार्यकर्त्यांनी करु नये याच उद्देशाने राज यांनी हे पत्र लिहिलं आहे.