मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्व 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देईल. मित्रपक्षांच्या जागेवरही भाजपाचेच उमेदवार असतील. त्यामुळे 48 पैकी 40 जागांवर भाजपा विजयी झाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. लातूरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संकल्प मेळाव्यात फडणवीस बोलत होते. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिल्या.

यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, ‘कार्यकर्ता हाच भाजपाची सर्वत मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 2 कोटी मते पडली पाहिजेत. असे झाले तर 2014 पेक्षा मोठा विजय आपल्याला 2019 मध्ये मिळेल. राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार असतील. मित्रपक्षांच्या जागांही यंदा भाजपाच लढेल. 48 पैकी किमान 40 जागांवर आपण विजयी झाले पाहिजे. मित्रपक्षांसोबत युती करायची की नाही हा अध्यक्षांचा विषय आहे’.

लातूरमध्ये भाजपाच्या बूथ विजय अभियानाला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही याबाबत संभ्रम असताना यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत.