निवडणूक प्रचारासाठी राजमुद्रा असलेला झेंडा नको असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केलं. मनसेने झेंड्याचा रंग बदलला. आधी हिरवा आणि निळा रंग असलेला मनसेचा झेंडा आता पूर्ण भगवा झाला आहे. या झेंड्यामध्ये दोन प्रकार आहेत. एका झेंड्यावर राजमुद्रा आहे. तर दुसऱ्या झेंड्यावर मनसेचं पक्षचिन्ह असलेलं रेल्वे इंजिन आहे. रेल्वे इंजिन असलेला झेंडाच आपण निवडणूक प्रचारात वापरायचा आहे. ज्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे तो झेंडा निवडणूक प्रचारात वापरायचा नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईतल्या गोरेगावमध्ये गुरुवारी घेण्यात आलं. या अधिवेशानत राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच झेंडा आवडला का? असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर झेंडा का बदलला तेदेखील सांगितलं. “पाच ते सहा वर्षांपूर्वीच झेंडा बदलायला हवा असं मला वाटत होतं. वर्षभरापूर्वीही मी विचार केला होता की शिवजयंतीच्या दिवशी आपण पक्षाचा झेंडा बदलू. मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या अधिवेशनाची परंपरा आता संपत चालली आहे. आपण हे अधिवेशन घेतलं म्हणून या दिवशी नवा झेंडा आणायचा असं मी ठरवलं. काही लोक झेंड्याचा रंग बदलण्याचा संबंध राजकीय परिस्थितीशी जोडू पाहात आहेत. मात्र हा निव्वळ योगायोग आहे” असंही राज ठाकरे म्हणाले.

“मनसेच्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यामुळे हा झेंडा हाती घ्याल तेव्हा तो कुठेही पडणार नाही, त्या झेंड्याचा अपमान होणार नाही याचीही काळजी घ्या. ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिवाय निवडणूक प्रचारासाठी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. निवडणूक प्रचारासाठी मनसेचं चिन्ह असलेला भगवा झेंडा वापरायचा” असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.