सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती आहे, ती संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वानी केले पाहिजे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी किल्ले रायगडवर बोलताना केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३३८ व्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यकमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणले तर देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, देशावर आज कुप्रवृत्तीची आक्रमणे सुरू झाली आहेत. चारित्र्याच्या पतनामुळे आज माता भगिनी सुरक्षितपणे फिरू शकत नाहीत. ही चिंतेची बाब आहे. संघटित शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, ज्या देशात गडाची डागडुजी करताना सोन्याचा हंडा मिळाला त्यातील एकही पसा कोणी घरी नाही नेला, अशा देशात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्याची वेळ येते हा दोष कोणाचा, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. शिवाजी महाराजांनी राजव्यवहाराची भाषा बदलली त्याप्रमाणे भारतीय भाषांमध्ये देशाचे व्यवहार झाले पाहिजेत, असे मतही सरसंघचालकांनी व्यक्त केले.