नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांना न्यायालयीन कोठडी, तर शरद कळसकरला 15 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी आज पुणे न्यायालयाने सुनावली. यावेळी सीबीआयच्या तपासावर न्यायालयाने नाराजी देखील व्यक्त केली. पुणे न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायाधीश एस.ए.सय्यद यांच्यासमोर सुनावणी झाली. सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे आणि आरोपीचे वकील धर्मराज यांनी काम पाहिले.

यावेळी बचाव पक्षाचे वकील धर्मराज युक्तीवाद करताना म्हणाले की, राजेश बंगेराकडे पानसरे हत्येप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सीबीआय कोठडीत असतानाही एटीएस आणि एसआयटीचे अधिकारी येऊन बंगेराकडे चौकशी करत आहेत. हा कोर्टाने दिलेल्या सीबीआय कोठडीचा दुरुपयोग आहे. त्याविषयी आरोपीला लेखी तक्रार करायची आहे. अंदुरेची देखील अशीच तक्रार आहे, तसेच सीबीआयकडे तपासाचे ठोस कारण नाही त्यामुळे रिमांड अॅप्लिकेशनमध्ये कारण नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलाकडून करण्यात आला.

तर, त्यांचे सर्व आरोप सरकारी वकील विनयकुमार ढाकणे यांनी युक्तीवाद करताना खोडून काढले. हायकोर्टाने सर्व तपास यंत्रणांनी समन्वयाने तपास करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा एकमेकांच्या आरोपींकडे चौकशी करु शकतात, असं सरकारी वकील म्हणाले.
शरद कळसकर, अमोल काळे, वीरेंद्र तावडे यांच्याकडून नेमके काय सांगण्यात आले होते याचा तपास करायचा आहे. शस्त्राचं प्रशिक्षण कोठे घेतले, पैसा कोणी पुरवला, याचीही चौकशी करायची आहे. त्यासाठी कोठडीची आवश्यकता असून अमोल काळे याची कोठडी 14 तारखेला संपत आहे. या सगळ्यांकडे एकत्र तपास करायचा आहे. या सर्वांना हत्या ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.