सोलापूर शहरवासीयांना पिण्यासाठी उजनी धरणातून साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, त्यानुसार बुधवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी टाकळी-औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला सुमारे आठवडय़ाचा कालावधी अपेक्षित आहे.
दहा लोकसंख्येच्या सोलापूर शहरासाठी उजनी धरण ते सोलापूर थेट जलवाहिनी योजनेसह टाकळी-औज बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. टाकळी-औज बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला आहे. केवळ आठवडाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीवाटे टाकळी-औज बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी होती. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत महाजन यांनी उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार साडेचार टीएमसी पाणी भीमा नदीवाटे टाकळी-औज बंधाऱ्यात सोडण्याची कार्यवाही तत्काळ हाती घेण्यात आली. सहा हजार क्युसेक विसर्गाने धरणातून भीमेत पाणी सोडले जात असल्याचे उजनी लाभक्षेत्र विकास मंडळाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी सांगितले.