सात महिन्यांत ५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; १० टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती जुलै महिन्यात पावसाने दिलेला १५ दिवसांचा खंड, दुबार व तिबार पेरणीचे संकट, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा यांमुळे शेतकरी आत्महत्यांनी नेहमी गाजणाऱ्या पश्चिम विदर्भात कोरडय़ा दुष्काळाचे सावट पसरले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये या विभागात ५५५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अमरावती विभागात आतापर्यंत सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला असून यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्य़ांत पावसाचे प्रमाण कमी आहे. यंदा अमरावती विभागात मान्सूनचे उशिरा आगमन झाले. बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्य़ात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली, पण नंतर पावसाने मोठा खंड दिला. अनेक भागांत दुबार पेरणी करावी लागली. पण त्यानंतरही पाऊस न बरसल्याने बिकट स्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी तर तिसऱ्यांदा शेतकऱ्यांना पेरणी करावी लागली. यंदा किमान १० टक्केक्षेत्र पडीक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा सोयाबिनचा पेरा वाढला आहे. पण, कपाशीचा पेरा घटला आहे. पावसाचे कमी प्रमाण या पिकांसाठी बाधक ठरण्याची शक्यता आहे. विभागात आतापर्यंत सरासरीच्या २५९ मि.मी. म्हणजे ७२ टक्केच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत संपूर्ण विभागात ११५ टक्के पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी पावसाने साथ दिली, पण यंदा उलटे चित्र आहे. अमरावती विभागात यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस न झाल्याने सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ होऊ शकलेली नाही. विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या २०.८४ टक्केच पाणीसाठा आहे. पुरेसा पाऊस न झाल्यास दुष्काळाची दाहकता जलसाठय़ाअभावी वाढणार आहे. अमरावती विभागात ५५५ आत्महत्या गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि वर्धा जिल्ह्य़ात ५५५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात १२३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे निदर्शनास आली आहेत. विभागात ८८ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्ह्य़ात आतापर्यंत ७० टक्के क्षेत्रात तर अमरावती जिल्ह्य़ात ७८ टक्के क्षेत्रातच पेरण्या होऊ शकल्या. मूग आणि उडीद या कमी कालावधीच्या पिकांची पेरणी रखडली. विभागात मुगाचा पेरा केवळ ५० टक्के क्षेत्रातच झाला आहे. सर्व जिल्ह्य़ांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात ९३ टक्के तर वाशीम जिल्ह्यात ९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हे दोन जिल्हे वगळता अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्य़ांत परिस्थिती चिंताजनक आहे. अकोला जिल्ह्य़ात २४० मि.मी. (७६ टक्के), अमरावती जिल्ह्य़ात २३५ मि.मी. (६५ टक्के), तर सर्वाधिक आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्य़ात २३८ मि.मी. (५७ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. विभागातील १० मोठय़ा धरणांमध्ये सद्य:स्थितीत ५०३ दशलक्ष घनमीटर म्हणजे २० टक्केच जलसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये १८७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. अजूनही तो २८ टक्क्यांच्या वर जाऊ शकला नाही. मध्यम प्रकल्पांमध्ये तर १८४ दलघमी म्हणजे १७ टक्केच पाणी उपलब्ध झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत सर्व धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा झाला होता. यावर्षी ही स्थिती पाहायला मिळेल काय, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. प्रचंड नुकसान गेल्या काही वर्षांपासून पश्चिम विदर्भ दुष्काळात होरपळत आहे. दोन वर्षांपूर्वी ओल्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर कधी गारपिटीने होणारे नुकसान तर कधी पावसाच्या अनियमिततेने कोरडवाहू शेती उद्ध्वस्त होताना शेतकऱ्यांनी पाहिली. नोटांबदीनंतर शेतीवरील संकट अधिकच गहिरे झाले. जुलै महिन्यात ३ ते १८ जुलैपर्यंत पावसाने खंड दिला. त्यामुळे झालेले शेतीचे नुकसान भरून निघणारे नाही. अमरावती विभागात मध्यंतरी पावसाने मोठा खंड दिल्याने काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असले, तरी आता पाऊस सुरू झाल्याने पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पावसाचे पुनरागमन होताच पेरण्यांची गती वाढेल. पावसाचे आगमन लांबल्याने मुगाचा पेरा कमी झाला आहे. ‘ड्राय स्पेल’मुळे तुरीच्या उत्पादनावर काही अंशी परिणाम होईल, पण इतर पिकांची स्थिती समाधानकारक आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या विभागीय सांख्यिकी अधिकारी प्रियंका भोसले यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.