मिरज-पंढरपूर रस्त्यावरील खरशिंग गावात एका पाच एकराच्या खडकाळ निकृष्ट जमिनीवर नंदनवन फुलवण्यात आलं आहे. दयानंद बापट यांच्या पुढाकारामुळे ही अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली आहे. दयानंद बापट यांनी या ओसाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. २९ जुलै २०१६ रोजी त्यांनी प्रारंभही केला. झाडे लावा झाडे जगवा ही निव्वळ घोषणा न देता त्यांनी प्रत्यक्षात या माळरानावर झाडे लावून त्यांचे संरक्षण केले आणि वाढवलीसुद्दा. सध्या येथे वड, पिंपळ, चिंच, गोरखचिंच, कदंब अशा विविध प्रकारच्या वृक्षांसह १५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. तसंच आंबा, अंजिर , डाळिंब, चिकू, सिताफळ अशा फळांच्या बागा आहेत. तीन वर्ष घेतलेल्या परिश्रमामुळे मोकळ्या रानमाळावर हिरवाई नटली आहे. आज या ओसाड माळावर उभी राहिलेली झाडं आणि विविध तऱ्हेच्या फुलांच्या बागा सगळ्यांनाच आकर्षित करत आहेत. दरम्यान यंदा पाच हजार तुळशीची रोप लावण्यात आली आहेत. या ठिकाणी आता पशुपक्षांचे आगमन देखील झाले आहे. पूर्वी एकही चिमणी याठिकाणी दिसत नव्हती. मात्र आता तीनशे, साडेतीनशेपेक्षा जास्त चिमण्यांची चिवचिव याठिकाणी ऐकू येत. यांच्यासाठी खास दाणा-पाण्याची सोय करण्यात आली आहे. पाण्यासाठी छोटे कुंडही तयार करण्यात आले आहेत. बाहेरील जनावरांना पाणी पिता यावे यासाठी गेटवर हौद बांधण्यात आले आहेत. पाण्याची गरज लक्षात घेऊन बोअरिंगची सोय करण्यात आली आहे. तसंच ६० लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. येथे उभारण्यात आलेल्या गोठ्यात गिरच्या गाई आल्या आहेत. दृढ निश्चय आणि परिश्रमातून स्वर्ग निर्माण होऊ शकतो हे दयानंद बापट आणि त्यांच्या अनुयायांनी करुन दाखवलं आहे. दयानंद बापट हे स्वत: इंजिनिअर असून त्यांचा एक व्यवसायही आहे. अध्यात्म क्षेत्रातही त्यांचे मोठे नाव आहे. पीर योगी दयानाथजी या नावाने त्यांना ओळखलं जातं. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नी स्वाती बापटदेखील त्यांच्यासोबत सक्रिय असतात. विशेष म्हणजे त्यादेखील इंजिनिअर आहेत. तसंच त्यांनी दत्तसेना या आपल्या अध्यात्मातील अनुयायींनाही प्रत्यक्ष कृतीतून झाडांचे महत्व पटवून दिले आहे. यामुळे ही मंडळीसुद्धा मोठ्या उत्साहात यात सहभागी होताना दिसतात. कित्येकांनी यामधून प्रभावित होत झाडे लावण्यास सुरूवात केली आहे. कलियुग कर्मप्रधान आहे, त्यामुळे काम करत राहा हा दयानंद बापट यांचा मंत्र आहे. तीन वर्षात निकृष्ट जमिनीवर अशी हिरवाई निर्माण होईल असं स्वप्न कुणी पाहिलं नसतं. त्यांनी मात्र दृढ निश्चयाने झाडे वाढवून त्यांना फळं फुलंही येतील ही काळजी घेतली. आधुनिक युगातील या कर्मयोगीचा महिमा आता वाढत आहे. अनेक बड्या मंडळींची आता या ठिकाणी वर्दळ सुरू झाली आहे. अनेकजण या ठिकाणी भेट देण्यास उत्सुक आहेत. या कर्मयोगीची सिद्ध तपस्या आणि मेहनत यातून दंडोबाच्या पायथ्याशी हे गिरनारी तपोवन चैतन्य पसरवत आहे.