वाढते प्रदूषण टाळण्यासाठी आणि पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्यासाठी वीजेवर चालणारी ई रिक्षा औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे. जाधववाडी येथील सन्नी सेंटरमध्ये अथर्व आणि श्री ई रिक्षा केंद्राची सुरूवात झाली. एका दिवसात ५० ई रिक्षांची बुकिंग झाली. पहिल्या ई रिक्षाला  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि महापौर भगवान घडामोडे यांनी हिरवा कंदिल दाखवला. औरंगाबाद हे पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे शहर आहे. देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले शहर अशी याची ओळख वाढत होती. हाच विळखा सोडवण्यासाठी आता ई रिक्षाचा पर्याय निवडण्यात आला आहे.

आत्तापर्यंत दिल्ली, कोलकाता, नागपूर या ठिकाणी ई रिक्षाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या रिक्षाची किंमत कमी आहे. बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षाचे भाडेही प्रवाशांना परवडण्याजोगे असणार आहे असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. एवढेच नाही तर मंगळवारी महापौर भगवान घडामोडे आणि हरिभाऊ बागडे यांनी ई रिक्षाचा प्रवासही केला.

ई-रिक्षा यंत्रणेच्या प्रणालीची अमंलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानेही परवानगी दिली आहे.त्याचबरोबर जे स्वतःची रिक्षा घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी बँकेचे कर्ज आणि इन्शुरन्सची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील ई-रिक्षा रस्त्यावर सुसाटपणे धावताना दिसणार आहेत. ही रिक्षा केवळ ३ युनिट इलेक्ट्रीसिटी चार्जिंगवर म्हणजेच २० ते २५ रुपयात ही रिक्षा साधारण १०० किलोमीटर धावू शकणार आहे.

ई रिक्षा घेतल्यानंतर चालकाला ई-भावना नावाचे एक कार्ड दिले जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातून रिक्षाचे चार्जिंग संपल्यास ते करून घेण्यासाठी पैसे देण्याची सोय आणि इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. देशातील पहिले ई-रिक्षा चार्जिंग सेंटर आणि राज्यातील पहिले ई-रिक्षा ट्रेनिंग सेंटरचा औरंगाबादमधये शुभारंभ झाला.