केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सूचना

स्थलांतर, गमावलेले रोजगार यामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहातून मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडण्याची शक्यता आहे. या मुलांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत.

करोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष हे ऑनलाइन वर्गात गेले आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाइन वर्गातही हजेरी लावू शकलेले नाहीत. राज्यातील पहिली ते आठवीच्या जवळपास १८ टक्के विद्यार्थ्यांशी गेल्या अनेक महिन्यात शिक्षकांचा संपर्कही होऊ शकलेला नाही. राज्याच्या शिक्षण विभागाची ही आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचे शिक्षकांनी सांगितले. अनेक कुटुंबांना रोजगार गमावण्याची वेळ आली आहे, कुटुंबे शहराकडून गावाकडे, परराज्यातही स्थलांतरीत झाली आहेत. या सगळ्या परिस्थितीत मुळातच राज्यात गेले काही वर्षे सातत्याने दिसणारा शाळाबाह्य़ मुलांचा प्रश्न यंदा अधिकच गंभाीर होण्याची शक्यता आहे. युनेस्कोनेही १८० देशांतील जवळपास अडीच कोटी मुले नव्याने शिक्षण प्रवाहाबाहेर फेकली जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आता घरोघरी जाऊन शाळाबाह्य़ मुले शोधण्याची मोहीम सुरू करण्याची सूचना केंद्राने दिली आहे. घरोघरी जाऊन ६ ते १८ वयोगटातील मुलांची नोंद घ्यायची आहे. शाळा बंद असताना झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी उपाय योजण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

सूचना काय?

’ शाळाबाह्य़ मुले शोधून त्यांना स्वयंसेवी संस्था, स्थानिक शिक्षक यांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात यावे.

’ अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

’ शाळा प्रवेशासाठी विशेष अभियान, प्रवेशोत्सव असे कार्यक्रम करण्यात यावेत.

’ करोना होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी याची माहिती पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात यावी

’ शालेय साहित्य, पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.