एकनाथ खडसे यांचा दावा जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या नऊ राज्यात शाखा असून ११०० कोटींची मालमत्ता मातीमोल भावात विकली गेल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. काही हितसंबंधितांकडून चौकशी दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी के ला. २०१८ पासून अॅड. कीर्ती पाटील यांच्यामार्फत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहोत. या प्रकरणांमध्ये ठेवीदारांना न्याय मिळावा अशी प्रामाणिक भूमिका घेऊन पाटील यांनी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. २०१८-१९ मध्ये राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे देखील वारंवार याप्रकरणी सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी देशमुख यांच्याशी शाब्दिक चकमक उडाल्याचेही खडसे यांनी सांगितले. पतसंस्थेचा घोटाळा हा खूप मोठा असून यामध्ये विविध क्षेत्रातील मंडळींचे हितसंबंध आहेत. तपासामध्ये सर्व बाबी येतील. याबाबतचा पुढील पाठपुरावा अॅड. कीर्ती पाटील यांच्यामार्फत आम्ही सुरू ठेवलेला आहे. दोन मालमोटारी भरून पुरावे जळगावातून नेल्यामुळे याच्या चौकशीला दोन ते तीन महिने लागू शकतात. ११०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जे ठेवीदार हतबल झाले, ज्या ठेवीदारांनी आत्महत्या केल्या किंवा अकस्मात मरण पावले अशा सर्व ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी अॅड. पाटील या प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण आहोत. हे प्रकरण लावून धरण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. यावेळी अॅड. कीर्ती पाटील यांनी २०१८ सालापासून आजवर केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील मंत्री यांनी कशा प्रकारे वागणूक दिली, कशा प्रकारे असहकार्य केले, याबाबत माहिती दिली. तीन वर्षांनी का होईना या प्रकरणात आता पोलीस निष्पक्षपणे चौकशी करताना दिसत आहेत. त्यांच्यावर काही प्रमाणात राजकीय दबाव देखील दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद के ले.