आम्ही फक्त सरकार स्थिर केले आहे, या वक्तव्यावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी आहे. त्यांना जर केवळ सरकार स्थिर करायचे असेल, तर मंत्रिमंडळात सहभाग न घेताही बाहेरून पाठिंबा देऊन सरकार स्थिर करता येते, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांशी बोलताना केले.
आम्ही फक्त सरकार स्थिर केले आहे. या सरकारने जनतेच्या हिताची कामे केली, तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र, मराठी माणसाचे हित न जपले गेल्यास शिवसेनेचे खासदार आणि आमदार सरकारला विरोध करतील, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. राज्यात युतीचे सरकार असताना शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे या दोन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते आहे.