एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झाला असून शुक्रवारी दुपारी २ वाजता हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत शिक्कामोर्तब केलं. यानंतर एकनाथ खडसे यांनी सर्वात प्रथम आपलं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे. @EknathKhadseBJP हे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट डिलीट करत खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची तयारी सुरु केली आहे.
दरम्यान खडसे @EknathGKhadse हे ट्विटर अकाऊंट वापरत असून त्यांनी आपण राजीनामा दिल्याची अधिकृत पोस्ट केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे ट्विट रिट्विटदेखील केलं आहे. एकनाथ खडसे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आज बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे”. खडसे यांनी ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील यांना टॅग केलं आहे.
आज बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. @BJP4Maharashtra @ChDadaPatil @NCPspeaks @Jayant_R_Patil
— Eknath Khadse (@EknathGKhadse) October 21, 2020
एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेत आपल्या निर्णय़ावर प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत.
“कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे,” असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.
आणखी वाचा- भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंडाचं प्रकरणी चौकशी लावली, त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजातने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”.
आणखी वाचा- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ती मागणी केली असती तर राजकीय संन्यास घेतला असता : खडसे
“तरीही त्यानंतर मी चार वर्ष काढली. नऊ महिने माझ्यावर आणि कथित पीएवर पाळत ठेवल्याचं मान्य केलं होतं. काय मिळालं काय नाही याचं दुख नाही. पण मनस्ताप खूप झाला याचं दुख: आहे. आयुष्यात अनेक पदं मी ताकदीने मिळवली आहेत. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मी निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनतेने मला मोठा प्रतिसाद दिला आहे आणि आजही देत आहेत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेसने कधीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती, तुम्ही एक प्रसंग दाखवून द्या,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
आणखी वाचा- ‘त्या’ वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
“मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एकप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट,” असं खडसेंनी म्हटलं. “भ्रष्टाचाराचा आरोप वैगेरे ठीक आहे, पण विनयभंगाचा आरोप किती वाईट, मी सुटलो त्यातून नाहीतर तीन महिने जेलमध्ये गेलो असतो. बदनामी घेऊन गेलो असतो,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 3:30 pm