स्थापनेपासून भाजपात असलेले नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षांतर करत राजकीय सीमोल्लंघन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित खडसे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंवर झालेल्या राजकीय अन्यायावर भाष्य करत भाजपावर टोलेबाजी केली. यावेळी खडसेंबद्दल उपस्थित केलेल्या जुन्या प्रश्नाची आठवण करून देत पाटील यांनी भाजपाला चिमटे काढले.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,”शरद पवार यांनी आधीच सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम घेण्याची सूचना केली होती. त्यामुळे आत केवळ ५० खुर्च्या ठेवल्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्याबद्दल मी शरद पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो,” असं पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले,”एकनाथ खडसे ४० वर्षांपासून ते काम करत आहे. पण, पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं. खडसेसाहेबांवर अन्याय झाला, कटकारस्थानं रचली गेली असतील. खडसेंच्या अन्यायबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहातही प्रश्न विचारला होता. कटप्पाने बाहुबलीने का मारलं, असं मी त्यावेळी विचारलं होतं. याचं उत्तर आजही मिळालं नाही. आजही ते (भाजपा नेते) टिव्हीवर कार्यक्रम बघत असतील. त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है,” अशी टोलेबाजी करत जयंत पाटील यांनी भाजपा नेत्यांना चिमटे काढले.

आणखी वाचा- “वाजपेयी-अडवाणी नसल्यानंही भाजपा थांबला नाही, खडसेंमुळेही थांबणार नाही”

“शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील ४-५ वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं,” असंही जयंत पाटील म्हणाले.