ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर भाजपाचा राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच आपण राष्ट्रवादी प्रवेश करत असल्याचं सांगत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला. खडसे यांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. याच मुद्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.

संभाजीराजे यांची पुण्यात आज पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पिकांच्या नासाडीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलं. त्याचबरोबर राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करत तातडीनं मदत करावी, अशी मागणीही केली. “मी राज्यातील शेतकरी वर्गाचे प्रश्न समजून घेण्यासाठी दौरे केले. त्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावणार आहे,” असं संभाजी राजे यांनी सांगितलं. हाच धागा पकडत ‘जळगाव येथील एक शेतकरी पक्ष सोडून गेले आहेत. तर त्यांच्या देखील समस्या जाणून घेणार का? कारण तेही शेतकरी आहेत,’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संभाजी राजे म्हणाले की, “मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार असून, मी राजकीय वक्तव्य करणार नाही. सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग मोकळा आहे,” असं सांगत एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्याला बगल दिली.

…तर राजेंना सुखाने राहायचा काही अधिकार नाही : संभाजी राजे

“आम्ही आजवर नवरात्रमध्ये कोल्हापूरमधून कधीच बाहेर पडलो नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे की, ‘आपला पोशिंदा संकटात असताना आणि त्याला जर त्रास होत असेल, तर राजेंना सुखानं राहायचा काही अधिकार नाही,’ अशी भूमिका खासदार संभाजी राजे यांनी मांडली. शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील संभाजीराजे यांनी सांगितले.