भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीकाही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, त्यांच्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहे असं खडसे पक्ष सोडण्याच्या निर्णयामागील कारणासंदर्भात बोलताना म्हणाले. त्याचप्रमाणे खडसे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याविरोधात कधी चौकशीची मागणी केली नाही असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा- ज्या राष्ट्रवादीवर टीका केली, त्याच पक्षात प्रवेश करताय या प्रश्नावर खडसे म्हणाले…

२०१४ साली फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर खडसे यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याचसंदर्भात बोलताना खडसे यांनी, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यावेळी विरोधात असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्या चौकशीची मागणीही केली नव्हती असं म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी साधी चौकशीहीची मागणी केली नसताना मला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं. त्यावेळी या पक्षांनी माझ्या चौकशीची मागणी केली असती तर मी राजकीय संन्यास घेतला असता असंही पुढे बोलताना खडसेंनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- ‘त्या’ वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भाजपामधून झाली होती. कार्यकर्ते, सरपंच, नेते आणि मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. एकनाथ खडसे सारख्या नेत्यांना पक्ष सोडणे, हा भाजपासाठी एक झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी दुपारी एकच्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं होतं. खडसे यांनी राष्ट्रवादीने आपल्याला कोणताही शब्द दिलेला नाही असंही स्पष्ट केलं आहे.