विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याची खदखद व्यक्त करतानाच भाजपाचे सरकार पुन्हा का सत्तेवर आले नाही, या कारणांचा उलगडा भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. आतापर्यंत नामोल्लेख टाळून टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या खडसे यांनी त्यांचं नाव घेऊन खडेबोल सुनावले आहेत. “जनाधार असलेल्या निष्ठावानांना तिकीट दिलं नाही म्हणून भाजपाचं सरकार आलं नाही,” असा धक्कादायक खुलासा खडसे यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एकनाथ खडसे यांनी दंडच थोपटले आहेत. तिकीट कापल्याची सल बोलून दाखवत खडसे यांनी फडणवीस आणि महाजन यांच्यावर आरोपांचे बाण सोडले. त्याचबरोबर एक दोन माणसांच्या हट्टामुळे पक्षाला नुकसान सोसावं लागल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खडसे म्हणाले,”भाजपाचं सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे आलं असतं. पण, जनाधार आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना तिकीट दिलं नाही. जनाधार नसलेल्या बाहेरच्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आली. आमच्याच उमेदवाराच्या समोर आमचेच बंडखोर उभे राहिले. त्याचा फटका बसला. देवेंद्र फडणवीस एकटे प्रचार करत फिरले. मात्र, राज्यातील नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन या नेत्यांना प्रचार करण्यास सांगण्यात आले नाही. त्यामुळे टीमवर्क उभं राहु शकले नाही. याचा प्रचारावर परिणाम झाला,” असं खडसे यांनी सांगितलं.

आणखी वाचा – फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं; एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

शरद पवारांची भेट घेतली, कारण…

खडसे नाराज असल्याचे वृत्त बाहेर आल्यानंतर राज्यात ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चेने फेर धरला होता. त्याच काळात खडसे यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीचा खुलासाही खडसे यांनी केला. “गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. राजकारणापासून दूर राहु शकत नाही. मतदारसंघात असलेल्या काही कामानिमित्तानं मी मध्यंतरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पुढेही कामानिमित्तानं भेट घ्यावी लागली तर घेत राहिल,” असं खडसे म्हणाले.