निवडणूक आयोगाने ऑक्टोबरअखेर मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील ४० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
येत्या २८ ऑक्टोबरला या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असून २९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची आणि माघार घेण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे.
चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ३६ ग्रामपंचायतींच्या ११५ प्रभागांसाठी ७१३ उमेदवार निवडणूक िरगणात असणार आहेत.
जिल्ह्य़ातील सहा तालुक्यांतील ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पेण तालुक्यातील ५, उरण तालुक्यातील ६, कर्जत तालुक्यातील ४, रोहा तालुक्यातील १८, म्हसळा तालुक्यातील ३ आणि श्रीवर्धन तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ४० ग्रामपंचायतींमधील १४३ प्रभागांतून ३९४ सदस्य निवडून द्यायचे आहेत.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत १२९६ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती. यातील ११९९ अर्ज वैध ठरले. १७ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली. ३९३ जणांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले.
चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पेण, रोहा, म्हसळा आणि श्रीवर्धनमधील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमधील २६ प्रभागांतील ९३ जागांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता ३६ ग्रामपंचायतींच्या ११५ प्रभागांमधील २९५ जागांसाठी आता प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. येत्या २८ ऑक्टोबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी ७१३ उमेदवार निवडणूक िरगणात असणार आहेत, तर २९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.