जिल्ह्यातील तीन तालुक्यात एकही सक्रिय रूग्ण नाही तर पाच तालुक्यात एक ते दोन सक्रिय रूग्ण आहेत. उर्वरीत तीन तालुक्यात सहा किंवा सहापेक्षा कमी रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी ११ तालुके करोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. जिल्हयातील एकूण सक्रिय २५१ रूग्णांपैकी २२९ एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील करोनाबाधित जवानांचा समावेश मोठया प्रमाणात आहे. इतर तालुक्यात फक्त २२ करोनाबाधित सध्या उपचार घेत आहेत.

गडचिरोली सोडून इतर ११ तालुक्यात आत्तापर्यंत बाहेरून आलेले १३१ रूग्ण करोनाबाधित आढळून आले होते. त्यांपैकी १०८ रूग्णांना करोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. उर्वरीत सर्व रूग्ण सध्या लक्षणे नसलेले असून, तेही लवकरच करोनामुक्त होतील असा विश्वास आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

करोना कोविड सेंटर (सीसीसी) वडसा येथे ३, अहेरी सीसीसी ०, सिरोंचा सीसीसी १, चामोर्शी सीसीसी ४, कुरखेडा सीसीसी २, धानोरा सीसीसी ६, मुलचेरा सीसीसी ०, एटापल्ली सीसीसी १, भामरागड सीसीसी २ तर गडचिरोली येथील वेगवेगळया तीन कोविड-१९ दवाखान्यात २२९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अहेरी, आरमोरी व कोरची या तालुक्यात एकही करोना रूग्ण सध्या उपचार घेत नाही.

जिल्हयात ४२९ रूग्णांपैकी १७७ रूग्णांनी आत्तापर्यंत करोनावर यशस्वी मात केली आहे. तर सिरोंचातील एका रूग्णाचे निदान व मृत्यू हैद्राबाद येथे झाला आहे. एकूण ४२९ करोनाबाधितांमध्ये २९३ सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे ते सर्व जवान जिल्ह्याबाहेरून बाधित होवून आले असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. यामध्ये राज्य राखीव दल २०१, केंद्रीय राखीव दल ८८, बीएसएफ २ आणि पोलीस २ अशा प्रकारे जवानांचा समावेश आहे. तसेच एकूण ४२९ रूग्णांपैकी राज्याबाहेरील ८३, जिल्ह्याबाहेरील २१० व बाहेरून आलेल्या परंतू स्थानिक १३६ नागरिकांचा समावेश आहे.

जिल्हयात १२ हजार कोरोना चाचण्या

जिल्हयात इतर जिल्हयांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठया प्रमाणात करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत ११,९९३ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये आरटीपीसीआरीसह इतर ट्रुनॅट ७४० व RATI ३९ तपासण्यांचा समावेश आहे. यापैकी ११,२८८ चाचण्या नकारात्मक आलेल्या आहेत. चाचण्यांच्या जास्त संख्येमुळे करोनाबाधित रूग्ण तातडीने शोधण्यास मदत होते. यातून जिल्ह्यात करोना संसर्गावर वेळेत नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला यश येत आहे.

जिल्हयात करोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू राहणार : दीपक सिंगला

जिल्हयात करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पुढेही लागूच राहणार आहेत. यामध्ये जिल्ह्याबाहेरील नागरिकांचा विनापरवाना प्रवेश जिल्ह्यात होऊ दिला जाणार नाही. यामुळेच गेल्या काही आठवडयांमध्ये ग्रामीण भागात आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवून प्रशासनाला करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे. जिल्हयात सुरक्षा दलाचे जवान दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणांहून येत असतात. मात्र, यावेळी ते करोनाबाधित क्षेत्रामधून कर्तव्य पार पाडून जिल्ह्यात दाखल झाले. आल्यानंतर त्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवण्यात आले होते. प्रशासन सुरक्षा दलाच्या जवानांबाबत आवश्यक खबरदारी घेत आहे. गडचिरोली शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतू करोना संसर्ग होवू नये म्हणून सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी.