एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवले आहे. यावर राज्यातील नेत्यांकडून संशय वक्त केला जात असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. “एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा ही प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केंद्राकडे का पाठवले नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

एल्गार परिषदेसंदर्भात केंद्रानं घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आबेडकर यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. ‘एबीपी माझा’ वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर म्हणाले, “शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच मी स्वागत करतो. हे प्रकरण केंद्रानं एनआयएकडे दिला आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांवर केंद्राकडून अविश्वासच आहे. त्यामुळे शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल,” असं आंबेडकर म्हणाले.

आणखी वाचा – सत्य बाहेर येईल म्हणून ‘एनआयए’कडे तपास दिला; शरद पवारांचा केंद्रावर गंभीर आरोप

ते तुरूंगातच सडणार का?

“या प्रकरणात केंद्र सरकार स्वतःची चमडी वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचं आता सांगितलं जात आहे. मग राष्ट्रीय सुरक्षेची संबंधित असलेलं हे प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच केंद्राकडे का पाठवलं नाही. पोलिसांनी ज्यांना अटक केलेली आहे, ते एल्गार परिषदेशी संबंधित नाही. एल्गार परिषद, कोरेगाव भीमा दोन्ही वेगळे मुद्दे आहेत. पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. पण, पोलिसांनी पकडलं म्हणून काही कार्यकर्ते तुरूंंगात आहेत. त्यांना नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आलेली आहे, ते तुरूंगातच सडणार का? असा मूळ प्रश्न आहे,” असा सवाल आंबेडकरांनी केला.