येथील बापूराव देशमुख सहकारी सूतगिरणीत कार्यरत कंत्राटी कामगार ओमप्रकाश अंबादास येसणकर यांनी वेतन न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

औद्योगिक परिसरातील सूतगिरणीचा कारभार एका कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. कंपनीने कंत्राटी पद्धतीवर काहींना कामावर घेतले. त्यांच्या वेतनाबाबत अडचणी होत्या. गत तीन महिन्यापासून वेतन थकीत असल्याने कामगार त्रस्त होते. त्यापैकीच एक येसणकर यांनी मृत्यूचे कारण चिठ्ठीत लिहून गळफोस घेत आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. घरी एक चिठ्ठी पत्नीच्या नावे तर घटनास्थळी दुसरी चिठ्ठी त्याच्या खिश्यात आढळून आली. जीवनाला कंटाळून व आर्थिक अडचणीतून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले असल्याचे सेवाग्राम पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ठेकेदार व अन्य कुणी जबाबदार असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.