वाहतुकीला व विकासकामांना अडथळा ठरणाऱ्या शहरातून जाणाऱ्या जामनेर, यावल, धरणगाव, मॉडर्न, खडका, जळगाव या रस्त्यांसह पंधरा बंगला परिसरातील अनधिकृत बांधकाम, अतिक्रमित टपऱ्या, हातगाडय़ा हटविण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पालिकेचे मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे. तीन दिवसांत या कारवाईत ३२५ पेक्षा अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. २८ जानेवारी पहाटेपासूनच कारवाईस सुरुवात झाली. कारवाईत ९८ ठिकाणचे अतिक्रमण तोडण्यात आले. २७ ठिकाणी फलक जप्त करण्यात आले. काही किरकोळ अपवाद वगळता कारवाई सुरळीत पार पडली. मोहिमेची दखल घेत दुसऱ्या दिवशी काही व्यावसायिक व नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले, जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नसल्यामुळे अतिक्रमणधारकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. शनिवारीही मोहीम सुरूच राहिली. उर्वरित अतिक्रमण पंधरवडय़ानंतर काढण्यात येणार आहे. तसेच भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी पोलीस व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नेमण्यात येणार असून शहरात निर्माण झालेल्या अतिक्रमणाबाबत ते अहवाल देतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत अतिक्रमण काढले जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी बाविस्कर यांनी दिली.