नो बॉलवरच माझी विकेट गेली, अशी खंत माजी वनमंत्री संजय राठोड यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. तसेच मीडिया ट्रायलचे ते शिकार झाले असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून वृत्तपत्राच्या छापील बातमीवर अजूनही जनसामान्यांचा विश्वास आहे. त्यामुळे ही विश्वासार्हता टिकून राहायला हवी, असंही ते म्हणाले. बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता. तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळं समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजपा नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असं राजीनामा देताना माजी मंत्री संजय राठोड म्हणाले होते.