भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. त्यानंतर स्वतः पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना "आपण एकनिष्ठ असून, पक्ष सोडणार नाही. जे काही बोलायचे ते १२ डिसेंबरला बोलेल," असं स्पष्ट केल्यानं सगळ्याच चर्चांवर पडदा पडला होता. मात्र, पूर्वाश्रमीचे भाजपाचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडे यांचं भाजपात खच्चीकरण केलं जात असल्याचा दावा केला आहे. आणखी वाचा- पंकजा यांच्या नाराजी अस्त्रानंतर भाजपचे नेते भेटीला परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे निराश झाल्या होत्या. त्यानंतर त्या फारशा सक्रिय दिसल्या नाही. अशातच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, राम शिंदे या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन पंकजा मुंडे पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. खुद्द पंकजा मुंडे यांनीही फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. त्यानंतर माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. "भाजपानं कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला आहे. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे. ओबीसी असल्यानं त्यांचही खच्चीकरण केलं जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा," असा सल्ला शेंडगे यांनी दिला आहे. भाजपात पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण केलं जात असल्याच्या शेंगडे यांच्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा पंकजांचं नाव चर्चेत आलं आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्या मनात काय सुरू आहे. त्यांची काय भूमिका आहे. या सगळ्या उत्तरांसाठी सगळ्यांचं लक्ष गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याकडं लागलं आहे.