हर्षद कशाळकर, अलिबाग

देशासाठी १९७१च्या युध्दात सहभागी झालेल्या आणि कामगिरी बजावतांना जखमी झालेल्या माजी सनिकावर हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. विठोबा मारूती परबळकर असे या माजी सनिकाचे नाव आहे. शासनाने दिलेल्या आपल्या हक्काच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी ते वयाच्या ७६ व्या वर्षी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. विठोबा मारूती परबळकर हे भारतीय सेना दलात कार्यरत होते, १९६३ साली सेनेत दाखल झालेल्या परबळकरांनी १९७१ साली झालेल्या युध्दात देशासाठी सहभाग घेतला होता. यावेळी बॉम्ब १०२ बॉम्बे इजिनिअर रेजिमेंटमध्ये ते कार्यरत असतांना युध्दातील बॉम्ब हल्ल्यात ते जखमी झाले होते. युध्दात बजावलेल्या शौर्याची दखल घेऊन त्यांना १९७३ साली शासनाने माणगाव तालुक्यातील रिळे पाचोळे येथे सात एकर जागा दिली होती. २२ वर्षे देश सेवा करून विठोबा परबळकर निवृत्त झाले. गावाकडे आले पण आजारपणामुळे त्यांना पुन्हा मुंबईत परतावे लागले. २०१७ साली जेव्हा ते परत गावाकडे तेव्हा त्यांनी आपल्या जागेची मोजणी करून घेतली. तेव्हा त्यांच्या जागेत काही अतिक्रमणे झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही अतिक्रमण हटवावी यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु केला. मात्र तीन वर्षांनंतरही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. सुरवातीला मागणावच्या तहसिलदारांकडे याबाबत पाठपुरावा केला. मात्र तिथे काहीच हाती लागले नाही म्हणून त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती. २०१८-१९ मध्ये याची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्या समोर झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी माणगाव, तहसिलदार माणगाव, उप अधिक्षक भुमिअभिलेख हे उपस्थित होते. या सुनावणी नंतर जिल्हाधिकारी यांनी ह्य़ा जागेवरील अतिक्रमण निष्कासित करावे आणि जागा परबळकर यांच्या ताब्यात द्यावी. सदर कारवाईचा अहवाल १ महिन्यात सादर करावा. असे निर्देश माणगावच्या तहसिलदारांना फेब्रुवारी महिन्यात दिले, पण जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरही तहसिलदारांनी चार महिन्यात कुठलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे हक्काच्या जागेसाठी पुन्हा एकदा शासकीय कार्यालयांचे उबरठे झिजवण्याची वेळ परबळकर यांच्यावर आली आहे.   गुरुवारी पुन्हा एकदा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. निवासी जिल्हाधिकारी डॉ, पद्मश्री बनाडे यांच्या समोर आपली व्यथा मांडली. त्यांनी पुन्हा एकदा तहसिलदारांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्याचे परबळकर यांनी यावेळी सांगीतले.

‘युध्दही इतके दिवस चालले नाही. जेवेढे दिवस मी माझ्या जागेसाठी पाठपुरावा करत आहे. तीन वर्ष पाठपुरावा करूनही शासकीय यंत्रणा दखल घेत नाही. जिल्हाधिकारी यांचे आदेश तहसिलदार पाळत नाही. वयाच्या ७६वर्षी आता मी न्याय कोणाकडे मागायचा.’

– विठोबा परबळकर, माजी सैनिक