यंदा तरी मिरगाचा पेरा, मोत्याचा तुरा साधण्यासाठी बळीराजाची धांदल उडाली असतानाच बियाणांचे दर दुपटीने वाढल्याने तो घायकुतीला आला आहे. पेरणीसाठी एकरी हजार रुपये मोजूनही औतवाला दादा वेळेला मिळेलच याची शाश्वती नसल्याने लाभलेली घात साधायची कशी याची विवंचना वेगळीच.
यंदा गेले पाच-सहा दिवसांपासून पावसाची जिल्ह्यात बहुतांशी भागात दमदार हजेरी लागल्याने खरिपाची मृग नक्षत्रात पेरणी करण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल उडाली आहे. पेरणीसाठी परा असला तर एकरी हजार अन्यथा बाराशे असा यंदाचा दर औतकऱ्यांनी काढला आहे. तालीच्या रानात अद्याप पाणी असल्याने हलक्या रानात पेरणीसाठी धांदल उडाली आहे. मृग नक्षत्रात पेरणी झाली तर नुसत्या मान्सूनच्या हवेवर पीक पन्नास टक्के लाभण्याची आशा असल्याने ही गडबड सुरू आहे.
जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्र खरिपासाठी आहे. गेल्या वर्षी खरिपाने दगा दिल्याने बऱ्याच शेतकऱ्याकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. यामुळे बाजारातील बियाणावरच अवलंबून राहावे लागणार आहे. नेमक्या याच परिस्थितीचा लाभ घेत बाजारातील बियाणे कंपन्यांनी बियाणांचे दर दुपटीने वाढविले आहेत.
बाजारातील बियाणांचा चालू वर्षीचा दर आणि गेल्या वर्षीचा दर असा आहे – उडीद २२० रुपये गेल्या वर्षी ११० रुपये, मूग २२० गेल्या वर्षी ११० रुपये, तूर २०० रुपये गतवर्षी १७५ रुपये, ज्वारी प्रति ३ किलो- ९५ रुपये, बाजरी १०० रुपये गेल्या वर्षी ९० रुपये, सोयाबीन ३० किलोसाठी २ हजार ४० रुपये मोजावे लागत असून गेल्या वर्षी यासाठी १ हजार ९५० रुपये मोजावे लागले होते. भात २५ किलोचा दर ४ हजार २४८ वरून ४ हजार ४६० रुपये झाला आहे.
याशिवाय बियाणेच उपलब्ध नसल्याचे सांगत साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा कृषी विभागाने पेरणीच्या हंगामात शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही, दर्जेदार बियाणे मिळेल यासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. मात्र कृषी सेवा केंद्राकडून किती बियाणांची मागणी नोंदविण्यात आली. प्रत्यक्ष विक्री किती झाली, शिल्लक बियाणे किती आहे याची पडताळणी केली जात नाही. साठेबाजीमुळे बियाणांसाठी मनमानी दर आकारण्याचे कारस्थान कृषी सेवा केंद्रातून सुरू असतानाही कृषी विभाग अद्याप सुस्तावलेलाच आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी भागातील कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस, कडेगाव, मिरज पूर्व भाग या भागात सध्या पेरणीची धांदल सुरू असून पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात धुळवाफेवर करण्यात आलेल्या भाताच्या पेरण्या पावसाने साधल्या आहेत.
बलजोडय़ा वेळेत मिळत नसल्याने काही ठिकाणी ट्रॅक्टरने पेरणीची कामे उरकण्यात येत आहेत. सखल भागात सध्या घात येण्याची प्रतीक्षा आहे.

 

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…