येथील समुद्रात प्लवंगांचे थवे सध्या मोठय़ा प्रमाणावर येत असल्यामुळे किनाऱ्यावर फुटणाऱ्या लाटांना विलोभनीय निळाई प्राप्त झाल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यातील भाटय़े, आरे—वारे, रिळ, वरवडे इत्यादी ठिकाणी किनारी भागात दरवर्षी नोव्हेंबर—डिसेंबर महिन्यात हे दृश्य पाहायला मिळते. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक निसर्गरम्य पर्वणीच ठरत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांंपासून रत्नागिरी शहराच्या किनाऱ्यांसह सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवरही हा अनुभव येत आहे. २०१७ साली रत्नागिरी तालुक्यातील आरे—वारे समुद्रात हे दृश्य प्रथम पाहायला मिळाले. या किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा वेगवेगळ्या ठिकाणी निळ्या रंगाने प्रकाशमान होताना दिसतात. एकीकडे किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटा आणि दुसरीकडे चमचम करणारे ते पाणी हा वेगळाच अनुभव असतो. स्थानिक मच्छिमार याला ‘पाणी पेटल’ किंवा ‘जाळ’' असे म्हणतात. यापूर्वी त्याचे प्रमाण लक्षातही न येण्या इतके अत्यल्प होते. मात्र आता ते वाढल्यामुळे नजरेत येऊ लागले आहे. गेल्या चार वर्षांचा असा अनुभव आहे की, थंडीचा मोसम सुरू झाला की कोटय़वधींच्या संख्येने ते प्लवंग रत्नागिरीच्या किनाऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीने रत्नागिरीच्या किनाऱ्यावरील लाटा फ्लुरोसंट पध्दतीने प्रकाशमान होतात. तापमानातील बदलामुळे हे जीव इतक्या मोठय़ा संख्येत देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आले असावेत, असे या विषयाचे अभ्यासकांकडून सांगितले जाते. सागरी जीव अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते या संदर्भात स्पष्टीकरण देताना म्हणाल्या की, रत्नागिरीच्या किनाऱ्याच्या लाटा उजळून टाकणाऱ्या या जिवांना ‘प्लवंग’असे म्हणतात. त्यांचे शास्त्रीय नाव ‘नॉकटील्युका’ आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात. एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर ते प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. यामुळे लाटा किनाऱ्यावर फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट उजळून निघते.