मागील तीन महिन्यापासून अंबानी आणि अदानी हे शेतकर्‍यांपासून सर्वसामान्य नागरिकापर्यंत रोषाला पात्र ठरत आहे. त्यापैकी अंबानी यांच्या घराबाहेर काल स्फोटकं आढळून आली आहे. हे घडवून आणलेलं षडयंत्र असून यातून सहानुभूती मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र असे काही होणार नसल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी त्यांना अंबानी घराबाहेर स्फोटक आढळल्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपली भूमिका मांडली.

“कृषी कायद्याचा फटका शेतकर्‍यांपासून सर्वसामान्य नागरिकाला बसणार आहे. पण या कृषी कायद्याचे लाभधारक १५ ते १६ जण आहेत. त्यापैकी अदानी आणि अंबांनी हे दोघांचे पुढे आले आहेत. मात्र काल त्यापैकी अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकं आढळून आली आहेत. त्यामुळे हे नेमकं घडवुन आणलं आहे का?” असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

“अंबानी यांना सहानुभूती मिळावी. यासाठी घडवलेले षडयंत्र असून एवढी स्फोटक मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा, मुंबई पोलीस, केंद्रीय यंत्रणा काय करीत होती? आमची मुंबई सुरक्षित नाही का?,” असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्याच्या पोलिसांनी किंवा केंद्रीय गुप्तचर खात्याने द्यावीत अशी मागणीही शेट्टी यांनी केलीय. तसेच त्यांनी या प्रकरणावरुन सीबीआयचा राजकीय वापर होत असल्याच्या मुद्द्यावरुनही सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेलाही टोला लगवाला. “आता सीबीआयने राजकीय कामाकडे लक्ष देण्यापेक्षा नेमकी ही स्फोटकं आली कुठून याचा तपास करण्याची गरज आहे,” असंही शेट्टी म्हणाले.

रक्तपात आणि हिंसाचाराशिवाय आमच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देणार नाही का : राजू शेट्टी</strong>

सरकारला अद्याप ही असे वाटत असेल की, आमचं काही अडत नाही. आमची कोंडी झालेली नाही. आम्ही आंदोलन मोडून काढू, या शेतकऱ्यांकडे लक्ष देणार नाही. किती दिवस बसतील. तर आम्ही तीन महिन्यात एक पीक घेणारे, आम्ही माणसं आहोत. त्यामुळे आमचा एक पूर्ण सिझन यात गेला आहे. तरी देखील राज्यकर्ते याची दखल घेणार नसतील. ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट असून २५० हून अधिक शेतकर्‍यांनी प्राण गमावलेला आहे. अजून आम्ही किती त्याग करावा, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली. तसेच रक्तपात आणि हिंसाचाराशिवाय आमच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देणार नाही का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.