संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३३ वे वर्ष आहे. गेल्या आठ वर्षांपासून निरंतर संत तुकाराम महाराज यांचे वंशज स्वप्नील मोरे आणि त्यांची फेसबुक दिंडी टीम सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अनेक उपक्रम करत असते. यावर्षी देखील ‘नेत्रवारी’ असा उपक्रम राबवणार आहेत.फेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रदानाचा फॉर्म भरता येणार आहे,अशी सुविधा केली असून आठ दिवसात तब्बल ८०० जणांनी नेत्रदानाचा फॉर्म भरला आहे. १० जून हा जागतिक नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या दिवसाच औचित्य साधून हा उपक्रम केला आहे.

फेसबुक दिंडी यावर्षी व्यंकटेश परिवार,औरंगाबाद या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ज्याचं नाव “नेत्रवारी” असं आहे. ज्यामुळे भविष्यात अनके अंधबांधवांना दृष्टी मिळणार आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासच दर्शन घडवणारी एक महान परंपरा आहे. या वारी परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मांना,पंथांना सामावून घेतले, अशी ही महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेच दर्शन घडवणारी वारी याची देही याची डोळा अनुभवण्यासारखं सुख दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. म्हणूनच’पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा,पाहीन मी याची देही याची डोळा ” असं म्हणत आजही लाखो वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाच गोजिर रूप पहाण्यासाठी वारीत पायी पंढरपूरपर्यंत चालत जातात. ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही असे लाखो ई-वारकरी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद मिळवतात. गेल्या आठ वर्षांपासून फेसबुक दिंडी हे काम अविरत पणे करत आहेत. पण आजही आपल्याच समाजातील एक घटक या सुख सोहळा पाहण्यापासून वंचित आहे, ते म्हणजे आपले अंध बांधव. त्यांना आपण ही वारी कशी दाखवू शकतो या साध्या कल्पनेतून नेत्रवारीचा जन्म झाला.

पंढरीची वारी हे फक्त एक उदाहरण आहे, पण जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडीने यावर्षी नेत्रवारी या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी फेसबुक दिंडीला भेट देऊन नेत्रदानाचा फॉर्म भरून नेत्रदाता बनू शकता.

सन २०१६ साली फेसबुक दिंडी टीम ने राबविलेल्या “पाणी वाचवा” या जलसंधारणाच्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद देत तब्बल १५ लाख नागरिकांनी फेसबुक दिंडीच्या पेजला भेट दिली. त्याप्रमाणे एका लाईकला १ रुपया मिळणार होता. तो जलसंधारणाच्या कामासाठी खर्च करायचा होता, त्याप्रमाणे त्यांनी १५ लाख रुपये बारामतीच्या बर्हाणपुर आणि कारखेल या गावात जलसंधारनाची कामे केली. तर गतवर्षी वारी “ती” ची या उपक्रमातून स्त्री भ्रूण हत्या,महिलांवरील वाढते अत्याचार,मासिक पाळी या विषयांवर प्रबोधन केले होते. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या “नेत्रवारी”उपक्रमाला देखील नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. यासाठी फेसबुक दिंडी टीमचे सदस्य संत तुकाराम महाराज यांचे वंशज स्वप्नील मोरे,मंगेश मोरे,अमित कुलकर्णी,सुरज दिघे,राहुल बुलबुले,अमोल निंबाळकर,ओंकार मरकळे,सुमित चव्हाण,ओंकार महामुनी हे नेहमी अग्रेसर असतात. हे करत असलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे.