राज्यभरातील ७० हजार आशा कार्यकर्त्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सरकार आम्हाला पाठीचा कणा म्हणतं पण आमचा पगाराचा वाढवत नाही. आमचा पगार वाढवावा आणि आम्हाला वैद्यकीय सुविधा द्याव्यात अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत. असं आशा कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. तर, या राज्यव्यापी संपावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“करोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी आहे. करोना काळात या सेविका अतिशय उत्कृष्ट काम करीत आहेत. समाधानकारक मानधन, विम्याचे कवच अशा प्राथमिक मागण्या त्यांच्या आहेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा संप लवकर मिटेल, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत!”असं फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तर, १२ तास काम करायला सांगायचे आणि मानधन मागितले की ठेंगा दाखवायचा हे आता आशा सहन करणार नाही, असा इशाराही आशांच्या राज्य संघटनेने दिलेला आहे.

“आम्हाला सरकारनं वेठबिगार बनवलं”, ‘आशा’ कार्यकर्त्यांचा संताप! राज्यव्यापी संपाला सुरुवात!

७० हजार आशांनी आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे गंभीर परिणाम ग्रामीण भागातील करोनाच्या कामावर होऊ शकतात असे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.  तर, आमची सुरक्षा, आमचे कुटुंब, कष्ट आणि मानधन यावर सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाही. उलट संप फोडण्याचे उद्योग सरकार करत आहे. एक हजार घरांचे सर्वेक्षण करणाऱ्या ‘आशां’ना सरकार रोज ३५ रुपये म्हणजे महिन्याला हजार रुपये देत असून ही ‘आशां’ची थट्टा असल्याचे राज्य ‘आशां’ कर्मचारी कृती समितचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितले.