विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधीपक्ष म्हणून भाजपाने या अधिवेशनात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची संपूर्ण तयारी केल्याचे संकेत दिले. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून काय तयारी केली आहे आणि नक्की कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न आहे यासंदर्भात उत्तरं दिली.

वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील वादवावरुन मंत्री पदाचा राजीनामा दिला. राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली होती. त्यामुळेच आता राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. याचसंदर्भात फडणवीस यांना या अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला प्रश्न विचारण्यात येतील असा प्रश्न अधिवेशनाच्या आधी पत्रकारांशी चर्चा करताना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी, “वीज बीलांचा मुद्दा ज्याप्रकारे मोठी न्यूज दिल्या आहेत. वीज बिलांसाठी वीज करण्याची अशी मोहीम यापूर्वी महाराष्ट्रात घडली नाही. शेतकऱ्यांचे सामान्य माणसांचे, गावातील शहरातील वीज कनेक्शन कट करण्याचं काम सुरु आहे. ही मोगलाई आहे,” असं सांगत वीज बिलांचा प्रश्न यंदाच्या अधिवेशनात गाजणार असल्याचे संकेत दिलेत. तसेच पुढे बोलताना फडवीस यांनी, “शेतकऱ्यांना घोषित केलेले पैसे मिळाले नाही. अतिवृष्टीचे सर्वेक्षणं झालेली नाहीत, पीक विम्यासाठी एजन्सी नेमलेल्या नाहीत. मोठ्याप्रमाणात जी खरेदी झाली पाहिजे ती झाली नाहीय. या मुद्द्यांबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकऱणावरही यावेळेस फडणवीस यांनी भाष्य केलं. “कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जी केविलवाणी स्थिती मी पाहिली ती केविलवाणी स्थिती मुख्यमंत्र्यांवर येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. ज्यावेळेस धडधडीत खोटं बोलावं लागतं, सर्व पुरावे असतानाही जणू काही घडलच नाही असं वागण्याचा प्रयत्न त्यांच्या चेहऱ्यावर मास्क असतानाही दिसत होता,” असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या क्लिप्स आहेत त्या खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं, जे काही माध्यमांनी बाहेर काढलं ते खरं की खोटं? एवढं झाल्यावरही जर कोणाला साधू-संत ठरवायचं असेल तर जरुर त्यांनी ठरवावं. पण मग यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं,” असंही फडणवीस म्हणाले.