गेल्या आठवडय़ात म्हणजे रविवारी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे ४ हजार ५६० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे यांनी दिली.
रविवारी राज्यातल्या अन्य काही भागांसह नांदेडमध्येही बेमोसमी पाऊस पडला होता. वादळ-वाऱ्यासह गारपीट झाल्याने १६ पकी ५ तालुक्यांतल्या शेतीला त्याचा मोठा फटका बसला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या ५७ गावांमधील शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. गारपिटीनंतर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वच तालुक्यातल्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. तब्बल ४ हजार ५६० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदेडसह अर्धापूर, लोहा, हदगाव व मुदखेड या पाच तालुक्यांत बेमोसमी पावसाने थमान घातले होते. अन्य तालुक्यांत बेमोसमी पावसाने हजेरी लावली असली तरी त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. हदगाव तालुक्यातल्या १३०० हेक्टरवरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी झालेल्या पावसानंतर बुधवारी काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोठेही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.