नापिकीला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील आढाळा या ठिकाणी घडली. शिवाजी अंबादास वायसे आणि त्यांची पत्नी धोंडूबाई शिवाजी वायसे या दोघांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. दहा दिवसांपूर्वीच राखी पौर्णिमेच्या दिवशी डिकसळ येथील गावातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी वायसे आणि त्यांच्या पत्नी धोंडूबाई हे दोघेही सोमवारी संध्याकाळी हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी आले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हे दोघे त्यांच्य घरी परतले. शिवाजी वायसे आणि धोंडूबाई हे दोघेही बहुला रस्त्यावर असलेल्या स्वतःच्या शेतातील घरात रहात होते. मात्र मंगळवारी सकाळी या दोघांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले. वायसे दाम्पत्याच्या नावे २ हेक्टर ५० गुंठे जमीन आहे. या दोघांवर बँक ऑफ इंडियाचे १ लाख रुपयांचे कर्ज आहे. सततची नापिकी आणि कर्ज फेडण्याची विवंचना यातून आलेल्या नैराश्यातूनच या दोघांनी आपले आयुष्य संपवले असा दावा वायसे दाम्पत्याच्या नातेवाईकांनी केला आहे. शेतकरी दाम्पत्याच्या मृतदेहांवर इटकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. कळंब पोलीस आणि तलाठी यांनी या प्रकरणी पंचनामा केला. कळंब पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.