तालुक्यातील चौगाव येथे विलास प्रकाश महाले (३५) या तरूण शेतकऱ्याने कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या मागील कारण स्पष्ट झालेले नाही.

वसंत महाले यांचे चौगाव शिवारात शेत असून त्यांच्या बांधाला लागून लहान भाऊ प्रकाश महाले यांचे शेत आहे. त्यांचा मुलगा विलास आणि वसंत महाले हे शुक्रवारी दिवसभर कांद्याच्या शेतात काम करीत होते. पिकाला पाणी भरण्याचे काम संपवून वसंत महाले सायंकाळी घरी निघून आले. मात्र शेजारील शेतात काम करणारा विलास रात्र झाली तरी घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे आई-वडील शोध घेण्यासाठी निघाले. भाऊ  वसंत यांनाही विचारणा केली. तेव्हा ते सुध्दा पुतण्या विलासला शोधण्यासाठी शेतात आले. शेतातील कांदा चाळीत पाहिले असता पुतण्या विलासने शेडच्या दांडय़ाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे दिसले.

वसंत महाले यांनी तत्काळ भावाला फोन करुन माहिती दिली. ग्रामस्थांनी धाव घेत विलासला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. विलास याने अचानक टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही.