चंद्रपूरमधील वरोरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवराव भिवाजी जिवतोडे (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे राहणारे देवराव भिवाजी जिवतोडे हे सोमवारी रात्री शेतावर जागल करण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी शेतावरुन परतत असताना धाणाच्या बंधितच वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर, यवतमाळ या भागात सध्या वाघाची दहशत आहे. गेल्या महिन्यातही चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका महिला शेतमजुराचा मृत्यू झाला होता. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनात विधासभेत केली होती.