तालुक्यातील सांगवी येथे शेतीच्या कौटुंबिक वादातून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. सांगवी येथे शेतीच्या वादातून तुकाराम धोंडू देवरे यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली.
शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी मयत व्यक्तीचा नातू, मोठा भाऊ सुभाष देवरे व त्यांचे साथीदार आत्माराम देवराम चव्हाण व नानाजी देवराम चव्हाण या तिघांना अटक केली आहे. कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साजन सोनवणे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.