मोहोळ तालुक्यातील दाईंगडेवाडी येथे एका ३५ वर्षांच्या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. मोहोळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

म्हाळप्पा हरिबा मोटे असे आत्महत्या करून मृत्यूला कवटाळलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. मोटे यांनी शेतीसाठी एका बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु दुष्काळाचे संकट आणि नापिकीमुळे ते अडचणीत सापडले. यातच त्यांनी दुष्काळातही पाण्याची व्यवस्था करून लागवड केलेल्या कांद्याला कमी भाव मिळाल्यामुळे त्यांची आणखी अडचण झाली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कशी हाताळायची, याची विवंचना त्यांना लागली होती. त्यातूनच मानसिक दडपणाखाली येऊन त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.