भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही. मात्र धोका कायम आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.
सध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. म्हणजेच आज देशातील भाजपा सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा त्यांचा मोठा शत्रू वाटतो आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेतं. दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. अशात कृषी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेस या कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे.
ट्रम्प यांच्या पराभवाच्या शक्यतेवरुनही टीकास्त्र
डोनाल्ड ट्रम्प यांनी काळा-गोरा असा भेद केला, तणाव निर्माण करुन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण जो जनतेत भेद निर्माण करतो त्याचा पराभव होतो. हे आता जगातलं नवं चक्र आहे. भेदभावाचं राजकारण करता येणार नाही हे सांगणारा निर्णय अमेरिकेत होतो आहे असा निर्णय भारतातही झाल्याशिवाय राहणार नाही असंही थोरात यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार मूठभर लोकांसाठी काम करतं आहे. केंद्र सरकारने धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा आणि आपली पोळी भाजायची पाहिजे तेवढा अन्याय जनतेवर करायचा, जनता काही बोलत नाही. मात्र आता हे धोरण चालणार नाही असंही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 4:59 pm