संघर्ष यात्रेतील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे साकडे

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासाठी निघालेली संघर्ष यात्रा सोमवारी पंढरपूर येथे पोहोचली. येथे आगमन झाल्यावर संघर्ष यात्रेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्या नंतर या नेत्यांनी सरकारला कर्ज माफी करण्याची बुद्धी दे, असे साकडे सावळ्या विठूरायाला घातले.

चांदा ते बांदापर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफी, पिकाला आधारभूत किमत आदी प्रश्न घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संघर्ष यात्रेचे आयोजन केले. ही संघर्ष यात्रा सोमवारी दुपारी मंगळवेढा माग्रे पंढरपूरला पोहचली.  शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील पुतळ्याला अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या नंतर या संघर्ष यात्रेतील आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट श्री विठ्ठल मंदिर गाठले. या मध्ये सर्वप्रथम राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर काँग्रेसचे भाई जगताप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. सुनील केदार, आ. प्रणिती िशदे, जोगेंद्र कवाडे, आ.भारत भालके यांनी दर्शन घेतले. सर्वात शेवटी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले. विखे पाटील हे हेलिकॉप्टरने पंढरपूरला आले होते.  या साऱ्या नेत्यांनी दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, कर्ज माफी होऊ दे, सरकारला कर्ज माफ करण्याची बुद्धी दे, बळिराजाचे राज्य येऊ दे असे विविध साकडे या नेत्यांनी सावळ्या विठूरायाला घातले. त्याच बरोबर सध्याचे सरकार कसे चुकीचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यासाठी सरकारचे प्राधान्य नाही या सह अनेक टीकाटिपणी करीत ही संघर्ष यात्रा पुढे गेली. एकंदरीत संघर्ष यात्रेतील यात्रेकरूंनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि साकडेही घातले. अर्थात त्यांचे साकडे खरे होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.