अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे निघून गेल्यानंतर खचलेल्या शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलीस व बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यास समजावल्याने तो सुखरूप खाली उतरला. मात्र यानिमित्ताने पीकविमा योजनेतील त्रुटी व ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. परभणी तालुक्यातील बोरवंड येथील शेतकरी नरहरी यादव हे बाजार समितीच्या परिसरात आले. मार्केट यार्डात असलेल्या कडूिलबाच्या झाडावर यादव यांनी चढून फांदीला गळफास लावला. यादव यांची एक हेक्टर जमीन असून त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. हे पीक अतिवृष्टीमुळे हातचे गेले. पीकविमा कंपन्या दाद देत नाहीत आणि विमा कंपन्यांकडून कोणताही दिलासा मिळत नाही. यामुळे यादव यांनी झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिथे मोठी गर्दी जमा झाली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. बाजार समितीच्या परिसरात हा सर्व प्रकार घडत असल्याने सर्व अधिकारी, कर्मचारी बाहेर आले. त्यानंतर यादव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. त्यानंतर यादव सुखरूप खाली उतरले. मात्र तोवर हा सर्व प्रकार पाहण्यासाठी बाजार समितीच्या आवारात मोठी गर्दी जमा झाली. जिल्ह्यत गतवर्षी सोयाबीनचे प्रचंड नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आमरण उपोषणासह अनेक आंदोलने केली. जिल्ह्यतील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ थेट तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांनाही भेटले होते. तर राज्यातही कृषिमंत्र्यांच्या दालनात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बठक पार पडली होती. जिल्ह्यतील शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई तातडीने देण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले होते, मात्र त्यानंतर काहीही झाले नाही. जिल्ह्यतील अनेक शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित राहिले. आताही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्यानंतर पीकविमा कंपन्यांची भूमिका संदिग्ध असल्याने शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना दिसून येत आहे. विमा कंपन्यांचे जिल्ह्यच्या ठिकाणी मुख्यालय असेल असे अपेक्षित असताना ‘अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ या कंपनीचे असे कोणतेही कार्यालय नाही. तालुका कृषी कार्यालयात विमाकंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. नुकसानीच्या पंचनाम्यास विमाकंपनी मान्यता देण्यासाठी नकार देत असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शेतकरी अस्वस्थ आहेत. पीकविमा भरपाई देण्यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपनी यांनी ४८ तासात पंचनामे करणे आवश्यक आहेत. असे असतानाही पीकविम्याबाबत शेतकऱ्यांना कोणतेच ठोस आश्वासन मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याने संतापाच्या घटना घडत आहेत.