राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमुक्ती बिनकामाची आहे. कारण त्यामुळे १५ ते १७ टक्केच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी येथे टीका केली.

पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, कर्जमुक्तीसाठी लावण्यात आलेले निकष सर्व शेतक ऱ्यांच्या हिताचे नाहीत. राज्यातील भाजपचे सरकार खोटे बोलणारे होते. सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीस काम करण्यास काही वेळ द्यावा लागेल. त्यानंतरच सध्याच्या सरकारबद्दल मत प्रदर्शन करता येईल. सात-बारा कोरा करावा ही आमची मागणी. केंद्राचा अर्थसंकल्प अलीकडेच जाहीर झाला. परंतु या अर्थसंकल्पात कृषी आणि शेतक ऱ्यांसाठी ठेवण्यात आलेली तरतूद कमी आहे.

सीएए, एनआरसी इत्यादी कायदे केंद्राने आणले आहेत. त्यामागचा उद्देश जनतेचे लक्ष बेरोजगारी आणि जीवनावश्यक बाबींपासून वळविणे हा आहे. राज ठाकरे यांनी रविवारी मुंबई येथे काढलेल्या मोर्चाच्या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मोर्चाचे समर्थन केले नाही, परंतु बाहेरच्या देशातून होणाऱ्या घुसखोरीवर सरकारने नियंत्रण ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले

संघटनेच्या पुनर्बाधणीसाठी आपण गेल्या दीड महिन्यापासून राज्याच्या दौऱ्यावर आहोत. येत्या २० फेब्रुवारी रोजी हा दौरा संपणार आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीत संघटनेच्या जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवरील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल. अडचणीत असलेल्या शेतक ऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. सध्या कापूस आणि तुरीच्या पिकास हमी भावापेक्षा कमी भाव बाजारात मिळत आहे. शिर्डी येथे आयोजित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. शेतक ऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा विचार यावेळी होईल, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी रविकांत तुपकर, साईनाथ चिन्नादोरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.