श्रीगोंदे तालुक्यातील बोरी येथे दहावीत शिकणाऱ्या आदिवासी समाजातील प्रवीण हनुमंत भोईटे या विद्यार्थ्यांने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्या शाळेचे मुख्याध्यापक शहाजी कुतवळ, हंगेवाडीचे सरपंच दत्तात्रेय रासकर व नागवडे कारखान्याचे संचालक तुळशीराम रायकर या तिघांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्दैवी प्रवीणचे वडील हनुमंत भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की शाळेमधील एका मुलीस प्रवीण याने प्रेमपत्र लिहिले होते. त्याचा राग येऊन शाळेचे मुख्याध्यापक कुतवळ, हंगेवाडीचे सरपंच रासकर व कारखान्याचे संचालक रायकर यांनी प्रवीण यास बोलावून घेऊन शाळेत सर्वासमक्ष मारहाण केली होती. हा अपमान सहन न झाल्याने प्रवीण याने आत्महत्या केली. माझ्या मुलाच्या मरणास हे तिघे जबाबदार आहेत असे भोईटे यांनी या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरुद्ध प्रवीण यास शिवीगाळ व मारहाण केली व आत्महत्येस भाग पाडले अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.