नव्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

पालघर/बोईसर : तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नव्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा पहिला टप्पा मंगळवारी कार्यान्वित करण्यात आला. तारापूरमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर यापुढे पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीत १४००हून  अधिक कारखाने आहे. स्थितीत ३५ ते ४० दशलक्ष घनमीटर सांडपाण्याची रोज निर्मिती होत असते. सध्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया  केंद्रात  २५ दशलक्ष घनमीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्राची क्षमता असल्याने उर्वरित सांडपाणी प्रक्रियेविना अरबी समुद्रात सोडण्यात येत असे.

तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटीतच्या वतीने ५० दशलक्ष घनमीटर समतेच्या प्रकल्पाचे काम गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले होते. सुमारे १२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या उभारणी खर्चात १०८ कोटी रुपयांचा सहभाग उद्योजकांचा आहे.

साडेबारा दशलक्ष घनमीटर क्षमतेचे चार युनिट या प्रकल्पात कार्यान्वित असतील. त्यापैकी दोन युनिट आज कार्यान्वित करण्यात आले. यात पहिल्या टप्प्याची चाचणी झाली. यामुळे तारापूर औद्योगिक वसाहतीत निर्मिती होणाऱ्या  सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया होईल, असा विश्वास तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटीच्या वतीने करण्यात आला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने या प्रकल्पाचे विधीवत उद्घाटन आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रमाला तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटी तसेच तारापूर येथील उद्य्ोजकांची संस्था टीमा चे पदाधिकारी उपस्थित होते. हा प्रकल्प मे २०२० अखेरीस पूर्णपणे करण्याचा संकल्प असून तारापूर परिसरातील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे तारापूर येथील औद्योगिक वसाहतीमधील ७५ दशलक्ष घनमीटर सांडपाण्यावर प्रक्रया करण्याची क्षमता निर्माण होणार असून प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्रात सात किलोमीटर खोलीवर सोडण्यासाठी प्रकल्प एमआयडीसी तर्फे हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प देखील मे २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

वृक्षरोपांची लागवड

अद्ययावत प्रक्रिया व्यवस्था असलेल्या या नव्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र परिसरात २० हजारांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली असून ऊर्जा कार्यक्षम आणि संगणकीकृत आणि ऑनलाइन पद्धतीने या केंद्रातील यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.