पावसाच्या अवकृपेने जिल्ह्यात मस्त्य व्यवसायावर संकट कोसळले असून दररोज होणारी लाखोची उलाढाल थांबल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली. ऑगस्ट निम्माअधिक सरला, तरी दमदार पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतेत आहे. पावसाच्या अवकृपेने भाजीपाला उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. शिवाय मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला. जिल्ह्यात मरळ, कत्ला यासह अन्य काही माशांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. मासे खाणारे खवय्ये अनेक आहेत. जिल्ह्यात मानार व विष्णुपुरी या दोन मोठय़ा प्रकल्पांसह मुखेड तालुक्यातील कुंद्राळा, करडखेड, उमरी तालुक्यातील कुदळा, कंधार तालुक्यातील पेठवडज महािलगी, किनवट तालुक्यातील नागझरी, लोणी, डोंगरगाव, लोहा तालुक्यातील उध्र्व मानार प्रकल्प, नांदेड जिल्ह्यातील आमदुरा व दिग्रस या मध्यम प्रकल्पांतून मोठय़ा प्रमाणात माशांचे उत्पादन होते.
अनेक लघुप्रकल्पांतही माशांचे उत्पादन होते. जिल्ह्यातील मरळ या माशाला मराठवाडय़ातच नव्हे, तर आंध्रातही मोठी मागणी आहे. दररोज या व्यवसायातून लाखोची उलाढाल होते. पावसाने दडी मारल्याने बहुतांश लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठय़ाने जुल महिन्यातच तळ गाठला. परिणामी मासे उत्पादनावर परिणाम झाला आहे. नदीकाठी वास्तव्यास असलेली अनेक कुटुंबे मत्स्य व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवतात. मृग नक्षत्रानंतर माशाच्या उत्पादनवाढीला प्रारंभ होतो. साधारणत: ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठय़ा प्रमाणात मासे उपलब्ध होतात. परंतु यंदा या व्यवसायाला पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे.
नांदेड शहराच्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, तसेच इतवारा, वसंतराव नाईक चौक, तरोडा नाका येथे दररोज माशांची विक्री होते. बुधवार, शुक्रवार या आठवडी बाजारासोबत रविवारीही मोठय़ा प्रमाणात माशांना मागणी असते. मात्र, उत्पादन घटल्याने २००-२५० रुपये किलो या भावाने मिळणाऱ्या मरळ माशांची रविवारी ३५० रुपये किलो दराने विक्री झाली. मरळसह अन्य जातींच्या माशांच्या दरात वाढ झाली आहे.