कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीसांकडून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर सोमवारी सकाळी कोल्हापूरमध्ये दोन अज्ञात व्यक्तींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. सोमवारी संध्याकाळी याप्रकरणी पाच तरूणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी, पोलीसांनी अद्यापपर्यंत त्यांची ओळख आणि माहिती जाहीर केलेली नाही. सध्या या तरूणांची कसून चौकशी केली जात असून गेल्या दोन दिवसांतील त्यांच्या मोबाईल फोन्सचे रेकॉर्डही पडताळले जात आहेत. हल्ल्याच्यावेळी हे तरूण नेमके कोणत्या ठिकाणी होते, याबद्दलही चौकशी केली जात आहे. त्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस युद्धपातळीवर कामाला लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांची १० पथके तयार करण्यात आल्याचे सांगितले होते.