अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात निकाली निघाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर टीकाही करण्यात आली होती. सरकारी कार्यालयात लोकांना आणखी खेटे मारावे लागली, असाही एक सूर उमटला होता. मात्र, पाच दिवसांचा आठवडा करताना सरकारनं कामाचा वेळ वाढवला आहे. त्यामुळे नागरिकांना सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सरकारी कार्यालये उघडी राहणार आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात यासंदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सकाळी ९.४५ वाजता कार्यालये सुरू होणार असून, सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शिपायांसाठी वेगळी कार्यालयीन वेळ आहे. शिपायांना ९.३० वाजता कार्यालयात हजर व्हावे लागणार असून, ६.३० वाजेपर्यंत थांबाव लागणार आहे. शासकीय कार्यालयांची नवीन वेळ - -२९ फेब्रुवारी २०२० पासून शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत आहे. सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील. -सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात आली असून, सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. -सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० अशी राहील. -या कायालयीन वेळेमध्ये ४ जून, २०१९ च्या शासन पदरपत्रकानुसार दुपारी १.०० ते २.०० या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भूत असेल. -औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्याांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत. अशा प्रकारच्या कार्यालयांची यादीही सरकारने दिली आहे. या यादीत दिलेल्या प्रकरात मोडणाऱ्या इतर कार्यालयांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.